मुंबई | विशेष प्रतिनिधी
राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत २२ जानेवारी रोजी मुंबईत जाहीर होणार आहे. या सोडतीकडे राज्यभरातील राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. आरक्षणानुसार महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार, हे या सोडतीतून स्पष्ट होणार आहे.
महापालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, अनेक महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. मात्र, महापौरपदाचे आरक्षण स्पष्ट झाल्याशिवाय अंतिम राजकीय समीकरणे ठरवणे शक्य नसल्याने ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, महिला तसेच खुल्या प्रवर्गासाठी महापौरपदे किती आणि कुठे असणार, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी इच्छुकांच्या आशा पल्लवित होणार, तर काही ठिकाणी राजकीय डावपेचांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
२२ जानेवारीला मुंबईत होणाऱ्या या सोडतीनंतर राज्यातील महापालिकांमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया वेगाने पार पडण्याची शक्यता असून, सत्तास्थापनेचे चित्रही अधिक स्पष्ट होणार आहे.





