नागपूर | विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका पत्राने आणि दाव्याने मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज्याचे लाडके नेते अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत असतानाच, आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात एक ‘बॉम्ब’ टाकला असून, या विलीनीकरणामागे गुजरातच्या एका बड्या उद्योगपतीचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
काय होता वडेट्टीवारांचा दावा?
विजय वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू होत्या. गुजरातच्या एका नामांकित उद्योगपतीने यासाठी मध्यस्थी केली होती. मात्र, या विलीनीकरणासाठी एक कडक अट घालण्यात आली होती- ती म्हणजे एनडीएला (NDA) पाठिंबा देणे. या अटीवर अद्याप पूर्णपणे एकमत झाले नव्हते, त्यामुळे ही प्रक्रिया थांबली होती, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
१२ फेब्रुवारीला होणार होती अधिकृत घोषणा?
विलीनीकरणाच्या या चर्चांना केवळ वडेट्टीवार यांनीच नाही, तर शरद पवार गटाच्या नेत्यांनीही दुजोरा दिला आहे.
-
जयंत पाटील: “अजितदादा विलीनीकरणासाठी अत्यंत आग्रही होते. माझ्या घरी या संदर्भात बैठकही झाली होती. १२ फेब्रुवारी रोजी या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा होणार होती,” असा खळबळजनक खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे.
-
शशिकांत शिंदे: शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तर शपथेवर या चर्चा झाल्याचा दावा केला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
अदानींची ‘ती’ भेट आणि विलीनीकरणाचे कनेक्शन?
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी बारामतीचा दौरा केला होता. AI सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उद्घाटनावेळी त्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले होते. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब आणि दोन्ही गटाचे नेते उपस्थित होते. या भेटीनंतरच दोन्ही राष्ट्रवादीतील अंतर कमी झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे आता या भेटीकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जात आहे.
अजितदादांच्या निधनाने चर्चांना पूर्णविराम, पण संभ्रम कायम
अजितदादांच्या ‘अकाली एक्झिट’मुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील हा संभाव्य भूकंप टळला असला, तरी अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. अजितदादांच्या गटातील अनेक बड्या नेत्यांनी मात्र या विलीनीकरणाबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगत ‘कानावर हात’ ठेवले आहेत. यामुळे कार्यकर्ते आणि सामान्य जनता यांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे.






