बारामती | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही, असे ठणकावून सांगत पवारांनी थेट फटकारले.
शरद पवार म्हणाले की, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. या चर्चांमध्ये देवेंद्र फडणवीस कुठेही सहभागी नव्हते. त्यामुळे त्यांनी यावर भाष्य करणे योग्य नाही, असे पवारांनी स्पष्ट केले.
याआधी 12 फेब्रुवारी रोजी विलिनीकरणाबाबत घोषणा होणार होती, असा दावा शरद पवार यांनी केला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना, अजित पवारांनी भाजपशी चर्चा केल्याशिवाय असा निर्णय घेतला असता का? असा सवाल उपस्थित केला होता. या वक्तव्यालाच शरद पवारांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले.
“खालच्या पातळीचं राजकारण नको”
पवार म्हणाले, “मला सगळं माहिती आहे. अजितदादा आणि माझे संबंध असे होते की ते प्रत्येक गोष्ट मला सांगायचे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही.”
अमेरिका–भारत व्यापार करारावरही भाष्य
पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अमेरिका–भारत व्यापार करारावरही मोठं विधान केलं.
“58 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत माझी कधीही संसदेत गैरहजेरी नव्हती. अर्थसंकल्पातून ठोस पावलं उचलली जातील अशी अपेक्षा होती,” असे ते म्हणाले.
अमेरिकेने भारतासाठी काही टॅरिफ कमी केल्याचं नमूद करत पवार म्हणाले की, पुढील दोन दिवसांत भारत–अमेरिका व्यापार कराराचं चित्र स्पष्ट होईल.
मात्र, “अमेरिका शक्तिशाली देश आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू केल्यास त्याचा परिणाम भारतीय शेतीवर होऊ शकतो,” अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.



