*परतीच्या पावसाने शेतकर्यांचे मोडले कंबरडे*
*पारशिवनी तालुक्यात वादळी वार्यासह पाऊस त्वरित पंचनामे करून मदत देण्याची मागणी*
पारशिवनी:-
तालुक्यातील जंगली भागात सोमवारी (२६ ऑक्टोबर) वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात मोसंबी, धान, कपासी व तूर या पिकांची नासाडी झाली. तालुक्यातील बहुसंख्य भाग जंगली असल्याने या परिसरातील नुकसानीचे त्वरित पंचनामे करून पीडित शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार वरूण कुमार सहारे यांना सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ दिवटे यांच्या नेतृत्वात शेतकर्यांनी दिले.
निवेदनानुसार, पारशिवनी तालुक्यातील बिटोली, धवलापूर, नरहर, बनेरा व कुकडा या गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेतीपुरक व्यवसाय आहे. यात बहुतांश शेतकर्यांची जंगलाला लागूनच शेती असल्याने जनावरांकडून पीक नुकसानी टाळण्याकरिता जीवाची पर्वा न करता शेतावरच वास्तव्याला असतात. स्वत: व परिवाराचा जीव धोक्यात घालुन शेती फुलवितात. मात्र, यंदा चांगला पाऊस झाल्याने परिसरातील शेतकर्यांच्या आशा बळावल्या असतानाच सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी वादळी वार्यासह २ मीमी पाऊस झाल्याने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महाराष्ट्र शासनाने नुकतेच नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी मदतीचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये पारशिवनी तालुक्याचा समावेश करून पीडित शेतकर्यांना दिलासा देण्यात यावा, अशी शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढा देणारे रामभाऊ दिवटे यांची मागणी आहे. शिष्टमंडळात पं. स. सदस्य किसन बंगारे, माजी पं. स. सदस्य रामचरण करनाके, धनराज शेंद्रे, जयराम कुंभरे, कैलास ईनवाते, अंतराम खंडाटे, लालजी ईनवाते, इंदुबाई खंडाटे, रामचंद्र कुंभरे, संतोष खंडाटे, शोभाराव कुंभरे, युवराज शेंदरे आदी कास्तकारांची उपस्थिती होती.