कन्हानमध्ये “गो सम्मान आव्हान” मोहिमेअंतर्गत निवेदन; गोसंरक्षणासाठी केंद्र सरकारकडे विविध मागण्या
कन्हान,ता.२७ – सुनील सरोदे
शहरासह ग्रामीण भागात “गो सम्मान आव्हान” मोहिम राबवून गोसंरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पारशिवनी तहसीलचे तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे प्रार्थना पत्र पाठविण्यात आले.

या निवेदनामध्ये देशात गोहत्येवर संपूर्ण बंदी घालावी, गाईला “राष्ट्रमाता” म्हणून घोषित करावे, गोसंरक्षणासाठी केंद्रीय कायदा करावा तसेच गोसेवेसाठी स्वतंत्र केंद्रीय मंत्रालय स्थापन करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरातील संत, गोभक्त आणि पशुप्रेमींनी “गो सम्मान आव्हान” मोहिम राबवून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेचा प्रभाव पारशिवनी तहसीलमध्येही दिसून आला. पशुप्रेमी शुभम बावनकर, आयुष संतापे, निखिलेश चाकोले, गौरव तिवारी यांनी पुढाकार घेत कन्हान, कांद्री, टेकाडी, खदान, वरडा, खेडी, गहु हिवरा आणि निलज परिसरात जनजागृती केली.

या दरम्यान स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली तसेच पत्रके वाटप करून नागरिकांना गोसंरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. हजारो नागरिकांनी मोहिमेत सहभाग नोंदवत स्वाक्षऱ्या केल्या. गोशाळांना पाठिंबा देणे, गायींचे संरक्षण करणे आणि समाजात गोमातेबद्दल आदर निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.








