२१ राज्यांत ‘ग्राहक दक्षता’चा विस्तार; नागपुरात तिसरा स्थापना दिन उत्साहात
नागपूर, ता. ७ – सुनील सरोदे
ग्राहक हक्क संरक्षण आणि जनजागृतीच्या क्षेत्रात भक्कम कामगिरी करणाऱ्या ‘ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन’ (GDKF) चा तिसरा स्थापना दिन मंगळवारी शंकरनगर येथील श्री साई सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अवघ्या तीन वर्षांत संस्थेने २१ राज्यांत ३,६०० स्वयंसेवकांच्या बळावर विस्तार साधत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

कार्यक्रमात ‘दक्षतेची वाट’ या मार्गदर्शिकेचे तसेच ‘भाई आया रे गॅस सिलेंडर’ या जनजागृतीपर गीताचे विमोचन करण्यात आले. ग्राहकांनी गॅस सिलिंडरचे वजन तपासणे, गळती (लीकेज) पाहणे, एक्सपायरी डेट पडताळणे व योग्य बिलिंग याबाबत जागरूक राहावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके यांनी आपल्या मनोगतात “लहानशा संकल्पातून सुरू झालेली ही चळवळ आज व्यापक आंदोलनात रूपांतरित झाली आहे. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्ष कृती करणे हेच आमचे ध्येय आहे,” असे सांगितले.

गेल्या तीन वर्षांत संस्थेने पोलिस व पुरवठा विभागाच्या समन्वयाने आठ राज्यांत २,१६० छापे टाकले. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होणारी १९,५०० ठिकाणे शोधून ३,४५० ठिकाणी काळाबाजार रोखण्यात यश मिळवले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये OTP/DAC प्रणाली लागू करण्यासाठीही संस्थेने पुढाकार घेतला. जनजागृती मोहिमेद्वारे १७५ जिल्ह्यांपर्यंत पोहोच साधण्यात आली.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांनी तरुणांच्या कार्याचे कौतुक करत ग्राहक हक्कांसाठी अशा संघटनांची गरज अधोरेखित केली. खासदार श्यामकुमार बर्वे (रामटेक) यांनी गॅस वितरणातील पारदर्शकतेसाठी संस्थेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले. जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष सचिन शिंपी यांनी गॅस दुर्घटनांमध्ये मिळणाऱ्या विमा संरक्षणाबाबत माहिती देत ‘दक्षतेची वाट’ पुस्तकाचे महत्त्व स्पष्ट केले. माजी सांस्कृतिक मंत्री (उत्तर प्रदेश) यशवंतराव निकोसे यांनी ग्राहक हक्क शिक्षणात समाविष्ट करण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमास दयाशंकर तिवारी (भाजप नागपूर शहर अध्यक्ष), किशोर कुमेरिया (माजी उपमहापौर), बालकृष्ण चौधरी (सदस्य, ग्राहक आयोग), तसेच नापतोल विभागाचे अधिकारी विनोद झोडापे यांची उपस्थिती होती.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सचिव जगदीश ठवरे, कोषाध्यक्ष गणेश सोळंके, सदस्य सुनील सरोदे, तरुण निर्बाण, चंद्रकांत आणेकर, कार्यकारी संचालक शुभम रंगारी, प्रकल्प प्रमुख रामेश्वर लष्करे, राज्य समन्वयक पायल मानकर, मुख्य संपर्क अधिकारी राशी मेश्राम, विधी सल्लागार प्राजक्ता मेश्राम यांचा सहभाग होता.

इतर राज्यांतील प्रतिनिधींमध्ये चेतन कुमार, अरुण माडगावे, संदीप गुप्ता (मध्य प्रदेश राज्य प्रमुख), नरेंद्र सिंग, लोकेश राघव, उमेश चव्हाण, सुमित चव्हाण आदींची उपस्थिती लक्षणीय होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल शेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप गुप्ता यांनी मानले. ‘किशोर नृत्य निकेतन, पुणे’च्या कलाकारांनी सादर केलेल्या लोकनृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांना ‘दक्षता रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. शेवटी सामूहिक ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






