दुर्गंधीयुक्त पाण्याने वाडीकर त्रस्त; संताजी तेली समाज संघटनेचे निवेदन
नागपूर, ता.,०९
वाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे येणारे पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर श्री संताजी अखिल तेली समाज संघटन, वाडी शाखेच्या वतीने वेणा जल प्राधिकरण विभागातील संबंधित अधिकारी मा. दत्तात्रे यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र जल प्राधिकरणामार्फत वेणा जलाशयातून वाडी व दत्तवाडी परिसरात पाणीपुरवठा केला जातो. मात्र अलीकडच्या काळात या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असून ते वापरण्यास अयोग्य असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेषत: लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी काही नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केले होते. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नाराजी वाढत आहे.
राज्यात ‘स्वच्छ पाणी, निरोगी आरोग्य’ या धोरणावर भर दिला जात असताना वाडी परिसरातही त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.








