पुलगाव-आर्वी नैरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर; संताजी तेली समाज संघटनेच्या पाठपुराव्याला यश
नागपूर, ता. ०९ – सुनील सरोदे
पुलगाव-आर्वी नैरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची दीर्घकालीन मागणी अखेर मान्य झाली असून, यासाठी श्री संताजी अखिल तेली समाज संघटन आर्वी शाखेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. या निर्णयामुळे आर्वी व परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
संघटनेच्या वतीने दि. १५ जानेवारी २०२४ रोजी प्रदेश उपाध्यक्ष अविनाश टाके तथा प्रविण सेलोकर यांच्या नेतृत्वात रेल्वे ब्रॉडगेजसाठी निवेदन सादर करण्यात आले होते. हे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले होते. संघटनेने सातत्याने या मागणीचा पाठपुरावा करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
संघटनेने सातत्याने या मागणीचा पाठपुरावा
दरम्यान, केंद्र सरकारने ही मागणी मान्य केल्याची माहिती समोर येताच कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. पुलगाव-आर्वी रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाल्यास प्रवासी व मालवाहतूक दोन्ही दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे आर्वी तालुक्याच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या यशाबाबत काही राजकीय पक्षांकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात हे कार्य संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच शक्य झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. “आम्हाला श्रेय नको, आम्ही समाजहितासाठी कार्य करतो,” अशी भूमिका संघटनेने मांडली.
या निर्णयाबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
आर्वीतील समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हे यश शक्य झाले असून, पुढील काळातही समाजहिताच्या प्रश्नांसाठी संघटना अशाच प्रकारे कार्यरत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.